महात्मा फुले माहिती


महात्मा फुले-एक संक्षिप्त परिचय
 महात्मा फुले
जोतीराव गोविंदराव फुले
जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
वडील: गोविंदराव फुले
आई: चिमणाबाई गोविंदराव फुले
पत्नी: सावित्रीबाई फुले
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली.
आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.
 
 बालपण आणि शिक्षण
 जोतीबा फुले यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.
१८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
 सामाजिक कार्य
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

       “ विद्येविना मती गेली।
         मतिविना नीती गेली।
         नीतिविना गती गेली।
         गतिविना वित्त गेले।
         वित्ताविना शूद्र खचले।
         इतके अनर्थ एका
          अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत.

समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते.
त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

        साहित्य आणि लेखन
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले.
त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला.
'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
तृतीय रत्न नाटक इ.स. १८५५
राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडाइ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९
गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३
शेतकऱ्यांचा असूड लेखसंग्रह इ.स. १८८३
सत्सार नियतकालिक इ.स. १८८५
इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह इ.स. १८८९

जोतीराव गोविंदराव फुले पश्चात प्रभाव

⭐महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली.
⭐राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
⭐जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
⭐फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन,
सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.
जोतीबा फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ, नाटक, चित्रपट वगैरे
           ललित
महात्मा फुले (चरित्र) लेखक : शंकर कऱ्हाडे
महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखिका : गिरीजा कीर महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विट्ठलराव भागवत
महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं. बा. सरदार महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. bagde महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक : धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी
महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे) महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
महात्मा जोतीरावकृतीशील वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे.
महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.
मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर
असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव मोरे

             ⭐जीवनपट⭐
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
☀इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
☀इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
☀इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
☀इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
☀इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
☀इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
☀इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
☀इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
☀इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
☀इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
☀इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
☀इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
☀इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
⚡विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.⚡

✒परि स्त्री शिक्षण;
हा एकची असे ध्यास,
हा एकची असे ध्यास,✒

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता
महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते
⭐आधुनिक भारतातले पहिल समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात असत.कारण ते सामन्यातील असले तरी विचारान व कर्तुत्वाने असामान्य होते.सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले.
⚡'शिक्षण व समता' या दो शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.
 सर्वसामान्यांसाठी  झटणारे ते सेवक होते 

No comments:

Post a Comment